चर्पटपंजरी मराठी समवृत्त भावार्थ
(श्री आद्य शंकराचार्य यांच्या चर्पटपंजरीवर आधारित)
रचना: श्री. मधुकर सोनवणे
भज गोविंदा, भज गोविंदा, वेड्या भक्ति करी हरिची ।
येईल मृत्यू समोर तेंव्हां, व्यर्थचि रे पोपटपंची ॥ १॥
सोड तू वेड्या हांव धनाची, कांस धरी रे निजरूपाची ।
जेही लाभे प्राक्तन योगे, तृप्ती तेणे हो चित्ताची ॥ २॥
यौवन वैभव बघुनि नारीचे, मोहि गुंतशी कां वेड्या ।
रक्त मांस चरबीच्या नश्वर, अस्थींच्या देही काड्या ॥ ३॥
कमलदलीच्या जलबिन्दू सम, जीवन अवघे एक क्षणाचे ।
झुरे देह चिंता व्याधीने, तो तर भक्षची रे काळाचे ॥ ४॥
कमाविशी जोवरी तोवरी, तुझा कळवळा स्नेहिजना ।
पराधीन होता म्हातारा, कवडीचीही किंमत ना ॥ ५॥
जोवरी देही प्राणज्योति तंव, तोवरी पुसतील कुशल तुला ।
देह अयोध्या राम सोडिता, शिवे न भार्या प्रेताला ॥ ६॥
संपे खेळातची बालपण, अर्थ काम यौवनी तसे ।
करीत चिंता, वृद्ध जाहला, आठव हरिचा परी नसे ॥ ७॥
म्हणशी पत्नी, पुत्रही माझे, तुला न माहित तू कोणाचा ।
आला कोठूनि, कुठे चालला, शोध करि रे तू सत्याचा ॥ ८॥
सत्संगाने, निःसंगत्वाचा, लाभे त्यातुनी निर्मोहत्व ।
निर्मोहत्वे निश्चलतत्त्व नि, प्रतीत त्यातुनी ईश्वरतत्त्व ॥ ९॥
जर्जर देही कामवासना, सुकले जल जणु सरोवरी ।
कवडि न हाती, दूर आप्तजन, तत्त्वचि नेइल पैलतिरी ॥ १०॥
धन यौवन नि सगे सोबती, गर्व सोड हे क्षणीक सारे ।
माया बंधा तोडुनी मिळवी, सत्य असे जे कालातीत रे ॥ ११॥
दिवस रात्र नि सकाळ संध्या, शिशिर वसंतही पुनःपुन्हा ।
जीवन धावे काळासंगे, आशाबंधन सुटेचि ना ॥ १२॥
धन नि कांता नकोच चिंता, वेड्या कुणी ना मार्ग दाविला ।
घेई आसरा सत्पुरुषांचा, तरुनि जावया भव अब्धिला ॥ १३॥
जटाधारि कुणी चमनचकोटा, भगवे कुणी ते संन्यासी ।
पोटासाठी सोंगे नाना, परि न भजती गोविंदासी ॥ १४॥
जर्जर गात्रे, कंपित काया, केशकलाप न वय लपवी ।
मंद चाल ती टेकित काठी, आशा परि बांधुनि ठेवी ॥ १५॥
आग पोटीची, घड्याळ तैसे, अखंड धावत तुज ठेवी ।
चार घास नि झोप अपुरी, आशा बांधुनी तुज फिरवी ॥ १६॥
कुरुते गङ्गासागरगमनं
व्रतपरिपालनमथवा दानम् ।
ज्ञानविहीनः सर्वमतेन
मुक्तिं न भजति जन्मशतेन ॥ १७॥
मंदिरी वा तू वृक्षाखाली, निवास करि साध्या वस्त्राने ।
भू वरी शय्या, पूर्ण विरागी, नित्य राही तू संतोषाने ॥ १८॥
रमता योगी अथवा भोगी, कांही लाभे रिक्त हात वा ।
देह करि साऱ्या व्यापारा, स्वानंदाची कधि न वानवा ॥ १९॥
वाच जरा तू भगवद्गीता, प्राशी गंगाजला जरा ।
चरण आठवी तू श्रीहरिचे, यमा कोठला मग थारा ॥ २०॥
पुन्हा जन्म नि मरण पुन्हा ते, नऊ मास जननी उदरी ।
हा भवसागर अतीच दुस्तर, वेड्या हरिचरणासी धरी ॥ २१॥
कवडी कवडी गोळा करुनी, खोपे केले वाळूंचे ।
पापपुण्य ना केली चिंता, बीज पेरले बाभळीचे ॥ २२॥
असे कोण तू, आला कोठुनि, किती जाहले माय पिता ।
शोधि उत्तरे अंतरात तू, नाटकापरी सर्व वृथा ॥ २३॥
मजमाझी नि तुजमाझीही चराचरहि विष्णुमय सारे ।
भेद ना करि सान थोर हा, समभावे जा शरण त्यास रे ॥ २४॥
शत्रुमित्र वा पुत्र बंधु ही ओळख विसरी अलगपणाची ।
पाही सकला निजरूपाने, नित्य प्रतीति अद्वैताची ॥ २५॥
क्रोध लोभ कामना मोह हे, सोड नि शोधी आत्मरुपाला ।
स्वबोध नसता अंधचि पुरता, अविरत भोगी तो नरकाला ॥ २६॥
वाच कधी तू गीता भागवत, ज्ञानेश्वरी नि कधी गाथा ।
नित्य आठवी हरिचरणाशी, सत्संगे हरि दीन व्यथा ॥ २७॥
भोग भोगिता, वाटे सुख परि, पुढच्या व्याधी साठविशी ।
अटळ मृत्यू तो निश्चित येई, दुश्चरणा कां आचरिशी ॥ २८॥
अर्थ असे तो अनर्थ नुसता, कधि न लाभते सौख्य तयाने ।
धनवंताला नित्य भय असे, स्वपुत्र फसविल कधी न जाणे ॥ २९॥
प्राणायाम नि प्रत्याहारे, नित्यानित्य विवेक विचारे ।
सत्य नि माया भेद यातला, शोधुनी स्मर त्या भगवंता रे ॥ ३०॥
श्रीगुरूच्या पदकमली आश्रय, सोड पाश हे संसाराचे ।
इंद्रिये नि मन नित्य संयमे, अनुभवी हृदयी सदन हरीचे ॥ ३१॥
नाद सोडी तू शास्त्र विधींचा, आचार्यांचा मार्ग अनुसरी ।
दिव्यत्वाला ओळख आपुल्या, नकोच गुंतू या संसारी ॥ ३२॥
भज गोविंदा, गोविंदा भज, वेड्या स्मर त्या गोविंदाला ।
इशस्मरणाविण अन्य मार्ग ना, जाया तरुनी भवाब्धिला ॥ ३३॥
चार दिसांचा असशी पाहुणा, इथले कांही तुझे नसे ।
हे माझे नि तेही माझे, मनात भरले तुझ्या पिसे ॥
दुर्मिळ जीवन वाया जाते, खेळी अडकला मायेच्या ।
नको मृगजळासाठी धावू, शरणी जा गोविंदाच्या ॥
जागृत होई, झडकरि वेड्या, जितुके क्षण तुझिया हाती ।
एक एक क्षण बहुमोलाचा, नको करू त्याची माती ॥
Composed by Madhukar Sonavane msonavane at hotmail.com
(aNNA) Posting on Mandiyali Google Group